Uttam Lakshan Chapter 4 | Class 10th Marathi | Questions and Answers { Maharashtra Board }

Uttam Lakshan Chapter 4 Solutions
Uttam Lakshan Chapter 4 Questions and Answers
Author Image Written by Hindibrave.in

नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत. इयत्ता १० वी मराठी कुमारभारती – उत्तमलक्षण कविता 4 स्वाध्याय (कृती) , “Uttam Lakshan Class 10 Marathi Chapter 4 Questions and Answers”.

4 उत्तमलक्षण कृती  | Uttam Lakshan Chapter 4 Solutions

प्रश्न १ ] आकृत्या पूर्ण करा.

(अ )

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 Uttam Lakshan Chapter 4 | Class 10th Marathi | Questions and Answers { Maharashtra Board }

उत्तर :-

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 1 Uttam Lakshan Chapter 4 | Class 10th Marathi | Questions and Answers { Maharashtra Board }

(आ )

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 2 Uttam Lakshan Chapter 4 | Class 10th Marathi | Questions and Answers { Maharashtra Board }

उत्तर :-

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 3 Uttam Lakshan Chapter 4 | Class 10th Marathi | Questions and Answers { Maharashtra Board }

(इ ) तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.

उत्तर :-

गुण:

  1. मी वेळेचे योग्य नियोजन करतो.
  2. मी मित्रांना नेहमी मदत करतो.
  3. मी अभ्यासात लक्ष देतो.

दोष:

  1. मी काही गोष्टी विसरतो.
  2. मी घरच्या कामांमध्ये नेहमी मदत करत नाही.
  3. मला खूप वेळ मोबाईल वापरण्याची सवय आहे.
प्रश्न २ ] खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

(अ) तोंडाळ ——
(आ) संत ——

उत्तर :-

(अ) तोंडाळ — तोंडाळासी भांडू नये.
(आ) संत — संतसंग खंडू नये.

प्रश्न ३ ] खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टीदक्षता
(१) आळस______
(२) परपीडा______
(३) सत्यमार्ग______

उत्तर :-

गोष्टीदक्षता
(१) आळस(१) आळसात सुख मानू नये
(२) परपीडा(२) परपीडा करू नये.
(३) सत्यमार्ग(३) सत्यमार्ग सोडू नये.
प्रश्न ४ ] काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’

उत्तर :-

आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.

काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात-लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

(आ) ‘सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.

उत्तर :-

‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.

(इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर :-

‘उत्तम लक्षण’ या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.

‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो!’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.

  • उत्तम – आदर्श, गुणसंपन्न,
  • लक्षण – गुणवैशिष्ट्य.
  • श्रोतीं – ऐकणाऱ्या लोकांनो.
  • सावधान – सावध होणे, सजग होणे.
  • उत्तम – उत्कृष्ट, जेणें – ज्याने.
  • बाणे – बाणणे, अंगिकारणे, सवय लागणे,
  • सर्वज्ञ – सारे जाणणारा.
  • पुसल्याविण – विचारल्याशिवाय,
  • येकायेकी – एकदम, पटकन.
  • जनीं – लोकांचे. आर्जव – विनंती.
  • पापद्रव्य – पापाने (कपटाने) मिळवलेली संपत्ती.
  • जोडू नये – साठवू नये.
  • पुण्यमार्ग – चांगला रस्ता, सद्वर्तन,
  • कदाकाळी – कोणत्याही वेळी.
  • तोंडाळ – वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ.
  • वाचाळ – व्यर्थ बडबड करणारा.
  • तंडो नये – तंटा (भांडण) करू नये.
  • संतसंग – सज्जन माणसाची संगत.
  • खंडू नये – तोडू नये.
  • अंतर्यामी – मनातून, हृदयातून.
  • आळस – काम न करणे.
  • चाहाडी – एखादयाबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा.
  • कार्य – काम,
  • सभा – समूहाची बैठक.
  • बाष्कळपणा – बालिशपणा.
  • पैज – स्पर्धा, शर्यत.
  • होड – पैज,
  • परपीडा – दुसऱ्याला छळणे, दुःख देणे.
  • विश्वासघात – बेइमानी.
  • व्यापकपण – (मनाचा) मोठेपणा.
  • पराधेन – परावलंबी, दुसऱ्यावर विसंबणे.
  • वोझें – (स्वत:चा) भार,
  • कोणीयेकासी – कोणावरही.
  • सत्यमार्ग – खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन.
  • असत्य – खोटेपणा.
  • पंथे – मार्गाने, वाटेने.
  • कदा – कधीही.
  • अभिमान – व्यर्थ गवं.
  • अपकीर्ति – बेअब्रू, वाईट प्रसिद्धी,
  • सत्कीर्ति – चांगली प्रसिद्धी.
  • वाडवावी – वाढवावी.
  • विवेके – चांगल्या विचाराने.
  • दृढ – ठाम, मजबूत, ठोस.

उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ :

उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात – श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. ।।१।।

पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये. वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये. फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. ।।२।।

लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. तिला अमान्य करू नये. पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करून पैसा मिळवू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये. ।।३।।

जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये. सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ।।४।।

काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये.) ।।५।।

सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये. मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये, कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये. कुणाशीही स्पर्धा करू नये. ।।६।।

कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी, उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ।।७।।

स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये. कुणावरी आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. ।।८।।

सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे, असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. ।।९।।

अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. ।।१०।।

१ ) कवितेचे नाव : उत्तम लक्षण

२ ) कवितेचा रचनाप्रकार : ओवी.

३ ) कवितेचा काव्यसंग्रह : श्रीदासबोध.

४ ) प्रस्तुत कवितेचे कवी : संत रामदास.

५ ) प्रस्तुत कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.

६ ) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ : (i) होड — पैज (ii) दृढ — ठाम

७ ) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव : आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास.

८ ) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :

प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो. 

९ ) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये :

प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे. ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत लवचीक रचनाप्रकार आहे. त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे. साहजिक कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे. चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दांत कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते.

१ ० ) कवितेची मध्यवर्ती कल्पना :

प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. समाजात वावरताना कसे वागावे, काय करावे व काय टाळावे यांचे सुस्पष्ट शब्दांत निवेदन केले आहे. समाज नीतिमान व कर्तबगार व्हावा, ही तळमळ या पदयपाठातून स्पष्टपणे जाणवते.

१ १ ) कवितेतून व्यक्त होणारा विचार :

प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी, व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. नेहमीच सावध मनाने वागावे. इतरांना सहकार्य करावे. कोणाशीही कपटाने वागू नये. तोंडाळ, वाचाळ माणसांना टाळावे. आळस झटकून टाकावा. पूर्ण विचार करून वागावे. उपकाराची परतफेड करावी. नेहमी उदारपणाने वागावे. मनाचा मोठेपणा बाळगावा. परावलंबी होऊ नये. नेहमी सत्याने वागावे. कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितले आहे.

१ २ ) कवितेतील आवडलेली ओळ :

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।।
विवेके दृढ धरावी । वाट सत्याची ।।

१ ३ ) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :

मला ही कविता खूप आवडली. एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली, स्वतःची, स्वतःसाठी असलेली वाटत राहते.

१ ४ ) कवितेतून मिळणारा संदेश :

प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो.

Class 10th Marathi Textbook Solution

Leave a Comment